राहत इंदौरी : उर्दूतल्या विद्रोही परंपरेचे वारसदार

र्दू ही शायरीची भाषा आहे. सौंदर्य हे त्याचे वैशिष्ट्य आहे. भाषिक सहिष्णुता ही त्याची व्यवच्छेदकता आहे. ही भाषा जीवनाच्या संमिश्रतेचे प्रतिनिधित्व करत असली तरी विद्रोह हा त्याचा आत्मा आहे. जगण्यासाठी जी-जी मुल्ये सौंदर्य देऊ शकतील उर्दूने त्याला कवटाळलं आहे.

गालीब हा त्याचा महाकवी तर इकबाल हे उर्दू काव्याचे तत्त्वज्ञ.

गालीबने जीवनातल्या दुःखांना सोबतीला घेऊन सत्तेच्या मदांध मस्तीला धडक दिली. तर इकबालने जीवनाच्या जळजळीत सत्याला त्याच्या ओंजळीत धरलं. उर्दूला समृद्ध करणारे हे दोन शायर उभे राहिले ते भारतीय इतिहासाच्या पटावरच. त्यांनी वारसा म्हणून भारताच्या गंगा-जमनी संस्कृतीला स्वीकारलं.

समृद्ध इतिहासातून विद्रोहासाठी धैर्य घेत हे दोघे पुढे आले. इंग्रजांच्या सत्तेला, त्यातून जन्मलेल्या जुलमाला उर्दू इतका प्रखर विरोध दुसऱ्या भाषेतील काव्याने केला नाही. कारण गरीबांच्या बाजूचा पक्षपाती विचार हा उर्दूच्या शायरीचा केंद्रबिंदू होता. गालीब या बाबतीत प्रातिनिधिक आहे. त्याने वसाहतीतील जगण्याच्या वास्तवाला अधोरेखित करताना लिहिलं आहे –

चिपक रहा है बदन पर लहू से पैरहन

हमारी जेब को अब हाजत-ए-रफू क्या है

वाचा : राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर

वाचा : शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा

जीवनाला इतक्या जखमा मिळाल्यात की, त्या जखमातून वाहलेल्या रक्तामुळे वस्त्रे शरीराला चिकटली आहेत. आता फाटलेल्या दामनला रफू देखील करण्याची आवश्यकता नाही. गालीबचा हा वारसा उर्दूतल्या अनेक कवींनी पुढे नेला व समृद्ध केला. पण गालीबच्या उर्दूला तत्त्वज्ञान दिलं ते इकबालने. उर्दू खऱ्या अर्थाने समृद्ध झाली, बहरली ती डॉ. इकबाल यांच्या काव्याने.

त्यांनी फारसी, तुर्की शायरीचे रचनाबंध, व्याकरणाचे नियम यांचा उपयोग करुन उर्दूला विकासाच्या नव्या टप्प्यावर आणलं. विद्रोह, नवविचार, तत्त्वज्ञानात्मक खंडकाव्य हे इकबालांच्या कवी जीवनाचं सार होतं. सॉक्रेटीस, ॲरिस्टॉटल, मार्क्स, डंकेन, हेगेल, लेनीन वर्डस्वर्थ वगैरे तत्त्वचिंतकाच्या तत्त्वज्ञानावर इकबाल यांनी त्यांच्या कवितातून चर्चा केली.

इकबाल यांनी मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादाचे कौतुक करताना त्याला कष्टकऱ्यांचा प्रेषित ठरवले. त्यांनी लिहिले – ‘निस्त पैगंबर व लेकीन दर बगल किताब’ मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की, जगात पैगंबर हे इश्वरी ग्रंथ घेऊन येतात. पण इकबाल म्हणतात मार्क्स हा असा पैगंबर होता, ज्याने अल्लाहचा प्रेषित नसतानाही जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला होता.

इकबाल यांना विद्रोहाचे वेड होते. इस्लामी तत्त्वज्ञानाचा शायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इकबाल यांनी या विद्रोहाच्या वेडापायी सैतानाने अल्लाहविरोधात केलेल्या विद्रोहाचेही कौतुक केले. ‘जिब्रईल व इब्लीस’ ही इकबालांची विख्यात कविता. देवदूत जिब्रईल व सैतानातील संवादावर आधारलेल्या या कवितेत सैतान जिब्रईलला म्हणतो,

‘मैं खटकता हूं दिल ए यज्दां में कांटे की तरह

तू फकत अल्लाहू, अल्लाहू, अल्लाहू’

(विद्रोहामुळे मी अल्लाहच्या हृदयाला काट्यासारखा बोचतोय. आणि तू फक्त अल्लाह, अल्लाह करत रहा.)

वाचा : इकबाल यांची कविता म्हणजे कामगार हिताचा एल्गार

वाचा : ग़ज़ल समर्पणाची भावना आणि फुलांचा दरवळ

‘लेनीन खुदा के हुजूर में’ या कवितेतही इकबाल यांनी कामगारांच्या दुःखाचा प्रतिनिधी म्हणून लेनीनला थेट अल्लाहच्या दरबारात त्याचे गऱ्हाणे मांडण्यासाठी नेलं आहे. त्यांच्या याच विवेकी विद्रोहाची परंपरा ‘फैज अहमद फैज’ यांनी शिखरावर पोहचवली. जनरल जियाऊल हक या पाकिस्तानच्या हुकूमशाहला आव्हान देताना, न्याय होणारंच आहे. त्यावेळी ‘सब ताज उछाले जाएंगे, सब तख्त गिराये जाएंगे’ आणि शेवटी फक्त माझ्यासारखा सामान्य माणूस शिल्लक राहणार असल्याचा इशारा दिला.

या कवितेने जियाऊल हक यांचा अंहकार दुखावला. त्यांनी या गीतावर पाकिस्तानात बंदी घातली. बंदी, हत्या, मृत्यूदंड अशा शिक्षांचा सामना करुनही उर्दू कवींनी विद्रोहाचा विचार त्यागला नाही. उलट विद्रोहाच्या तत्त्वज्ञानाचा विकास करण्यासाठी त्यांनी प्राणांतिक संघर्ष केला. गालीबपासून सुरू झालेल्या विद्रोहाच्या या परंपरेचा वर्तमान वारसदार म्हणून राहत इंदौरी यांच्याकडे पाहिले जातं.

संघर्ष ललाटी बांधलेल्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीत राहत इंदौरींचा जन्म झाला. काही काळ विद्यार्थी चळवळीत घालवलेल्या राहत इंदौरी यांनी गरीबांच जगणं जवळून अनुभवलं होतं. त्यातला दर्द त्यांनी सोसला होता. म्हणून गरीबांचा प्रतिनिधी म्हणून ते शायरीच्या प्रांतात उभे राहिले.

सर्जनशीलता ही त्यांना निसर्गाकडून जन्मजात मिळालेली होती. सुरुवातीच्या काळात कुटुंबाच्या आर्थिक हालाखीला दूर करण्यासाठी त्यांनी चित्रकार म्हणूनही काम केलं. आणिबाणीविरोधातला संघर्ष त्यांनी विद्यार्थी दशेत अनुभवला होता. एकाधिकारशाहीविरोधात लोकशाही मुल्यांचे समर्थन करत त्यांनी केलेलं लिखाण हे त्यांना युवावस्थेत मिळालेल्या अनुभूतीचा परिणाम होता.

वाचा : उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व

वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार

सन 2014 साली केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर झुंडबळीच्या घटना घडू लागल्या. त्यानंतर मनुव्वर राणा, इमरान प्रतापगढी, राहत इंदौरी या त्रयींच्या राजकीय विद्रोहात्मक शायरीची चर्चा सुरू झाली. मुनव्वर राणा यांनी सत्तेविरोधात आघाडी उघडल्यानंतर राहत इंदौरी त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले. राष्ट्रवादाच्या सांस्कृतिक अन्वयार्थाविरोधात त्यांनी अनेक शेर लिहिले. प्रतिगामी गटाच्या राष्ट्रवादाविषयी आपली भूमिका मांडली. सत्ता प्रणित राष्ट्रवादाला त्यांनी फटकारलं. त्यांनी लिहिलं –

जो आज साहिब ए मसनद हैं कल नहीं होंगे

किराएदार हैं जाती मकान थोडी है।

सभी का खून है शामील इस मिट्टी में

किसी के बाप का हिन्दुस्तान थोडी है।

जे आज सत्तेत आहेत, ते उद्या असणार नाहीत. ही लोकशाही आहे, सत्तेवर त्यांची मालकी नाही. हा देश घडविण्यात सगळ्यांचेच योगदान आहे. हा देश कुणाच्या बापाचा नाही. आता जगणं काही साधं राहिलं नाही. संघर्षाकडे पाठ फिरवण्यात काहीच अर्थ नाही, हे त्यांनी ठासून सांगितलं. राहत लिहितात –

‘आंखो में पानी रखो होठों पे चिंगारी रखो

जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो’

माध्यमांच्या बदलत्या भूमिकांवरही राहत इंदौरी यांनी कठोर शब्दा टीका केली. सत्तेच्या समर्थनार्थ सुरू असलेली पत्रकारिता त्यांनी मान्य नव्हती. त्यांनी अत्यंत मार्मिक पण उपरोधात्मक टीका करताना म्हटलं –

‘बनके हादसा बाजार में आ जाएगा

जो नहीं वह अखबार में आ जाएगा।

चोर उचक्कों की करो कद्र कि मालूम नहीं

कौन कब सरकार में आ जाएगा।

राहत इंदौरी यांनी कधीच कुणाची भिडभाड ठेवली नाही. पुरस्कारांसाठी किंवा मानधनासाठी स्वतःच्या भूमिका त्यांनी गहाण ठेवल्या नाहीत. राज्यस्थानमध्ये सेहूर शहरात आयोजित एका मुशायऱ्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकांवर टीका केली. त्यावेळी विचारमंचावर भाजपचे मंत्री उपस्थित होते.

राहत यांच्या कवितेने त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यांनी थेट माईकचा ताबा घेतला आणि राहत यांना शहाणपणाचा उपदेश दिला. पण राहत इंदौरी मागे हटले नाहीत. उपस्थित रसिक राहत इंदौरींच्या समर्थनार्थ उभे राहिले आणि मंत्र्यांना कार्यक्रम सोडून पळ काढावा लागला. त्यावेळी राहत मंत्र्यांना उद्देशून म्हणाले होते –

‘जुंबा तो खोल नजर तो मिला, जवाब तो दे

मैं कितनी बार लुटा हूं, मुझे हिसाब तो दे’

सत्तेला शहाणपण शिकवता येत नाही, पण विरोध करून त्याचा अहंकार उतरवता येतो हे राहत इंदौरी यांनी अनेक वेळा दाखवून दिलं. भारतीय समाजाला आज अभूतपूर्व अशी सत्तेच्या समिक्षकांची गरज आहे. अशा काळात राहत इंदौरी यांचे जाणे खूप वेदनादायी आहे. ते देशासाठी भूमिका घेऊन जगणारे कवी होते. सामाजिक विवेकाचा बळी घेणारी झुंडनितीची महामारी सर्वत्र सुरू असताना मी झुंडीसोबत जाणार नाही असे ते म्हणाले होते.

‘वबा फैली है हर तरफ,

अभी महौल मर जाने का नहीं है।’

झुंडीच्या महामारीने त्यांना नेलं नाही. पण कोरोनाच्या महामारीत ते गेले. ते आपल्यात नाहीत हे वास्तव स्वीकारून आपल्याला आता विद्रोहाचा नवा प्रतिनिधी जन्मास घालावा लागेल. तीच राहतविषयीची कृतज्ञता असेल.

जाता जाता :