बॉलीवूडचे इफ्तेखार दिसताच, खरे पोलीस त्यांना सॅल्युट ठोकत

भारतीय भाषेतील कोणत्याही चित्रपटात सर्वात शेवटी प्रवेश करणारे महत्वाचे पात्र म्हणजे ‘पोलीस इन्स्पेक्टर’ अर्थात मुख्य भूमिका इन्स्पेक्टरची नसेल तर ! मग तो चित्रपट कोणत्याही भाषेतील असो. सिनेटसृष्टीतला असा क्वचितच एखादा मूख्य अभिनेता असेल ज्याला या व्यक्तिरेखेचा मोह पडला नसेल.

प्रत्यक्षातील आमची पोलीस यत्रंणा बऱ्याच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने लिप्त होत चालली असताना चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टर मात्र सच्चा आणि अत्याचाराच्या विरोधी तुटून पडणारा दाखवला जातो. हा एक विरोधाभास आहे.

हल्ली अनेक चांगल्या गोष्टी अपवाद या सदराखाली मोडत आहेत ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. पण हे खरे आहे की आम्हाला चित्रपटातील मुख्य नायकाचे पोलीस इन्स्पेक्टर खूप भावतात. कारण हे हमखास गरीबांना न्याय मिळवून देणारे असतात. वेळेप्रसंगी एकट्याने १०-१५ गुंडाशी झूंज देतात.

आम्ही भारतीय प्रेक्षक बऱ्यापैकी आशावादी असतो. बहुतेक चित्रपटातील कथानक आमच्या स्वप्नांचा आरसा असतो मात्र हा आरसा काळोखात लुप्त होतो. चित्रपट मात्र काळोखातच अधिक स्पष्टपणे दिसत असतात. अर्थात प्रत्यक्षातील पोलीस इन्स्पेक्टर आणि चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टर यात बऱ्यापैकी फरक असतो. कदाचित म्हणूनच आम्हा प्रेक्षकांना पडद्यावरचे पोलीस अधिक भावतात.

वाचा : ‘साहिबे आलम’ दिलीपकुमार यांचा मराठी बाणा

वाचा : जॉनी वॉकर : नायकाच्या समांतर रोल मिळवणारा सहयोगी कलावंत    

गायक ते अभिनेता

२२ फेब्रुवारी १९२० रोजी जालधंरमध्ये जन्मलेल्या सय्यदना इफ्तेखार अहमद शरीफ असं लांबलचक नाव असलेल्या या तरुणाला गाण्याचं आणि चित्रकलेच भयंकर वेड. मॅट्रीक परीक्ष पास होताच याने थेट लखनौ कला महाविद्यालय गाठले आणि चित्रकलेचे पद्धतशीर शिक्षण घ्यायला सुरुवात केली.

गाण्याचंही अपार वेड. त्याकाळात जसे सर्वच गायक कुंदनलाल सहगलच्या प्रेमात असायचे तसा हादेखील होता. सहगलच्या वेडामुळे असेल कदाचित की त्याकाळचे बहुतेक नायक स्वत:चे गाणे आपणच म्हणायचे.

२० वर्षाचा असताना एकदा हा कलकत्त्याला गेला. कारण काय तर तेथे कमल दासगुप्ता नावाच्या संगीतकाराने एक गाण्याची ऑडिशन ठेवली होती. विशेष म्हणजे हा पठ्ठा त्या ऑडिशनमध्ये पास झाला. कमल दासगुप्ता त्यावेळी एच.एम.व्ही. या ग्रामोफोन कंपनीत काम करत असत. ते इफ्तेखारच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झाले आणि त्यांनी एम.पी. प्रॉडक्शन नावाच्या चित्रपट कंपनीकडे याची शिफारस केली पण गायकाची नाही तर अभिनेत्याची.

त्या कंपनीत हे महाशय जेव्हा गेले तेव्हा तेथे एस.डी. बर्मन हे देखील दोन गायकांची गाण्याची टेस्ट घेत होते. त्यांच्याशी भेटून व आपली स्क्रीनटेस्ट आणि दोन गाणी रेकॉर्ड करून मग इफ्तेखार कानपूरला आपल्या कुटुंबात परतले.

चित्रपटसृष्टीत अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्याना जे व्हायचं होतं, ते न होता वेगळीच ओळख मिळाली. मुकेश यानांही नायक व्हायचे होते ते गायक झाले. गुरूदत्तलाही खरा रस दिग्दर्शनातच होता नायकात नाही. तर सुभाष घई देखील नायक होण्याचे स्वप्न घेऊनच इथे आले व मोठे शोमन झाले.

सय्यदना इफ्तेखार अहमद शरीफलाही गायकीतच काही तरी करायचं होतं. सुरुवातही तशीच झाली होती. काही महिन्यानंतर त्यांच्या दोन गाण्याची रेकॉर्ड बाजारात आली. तेव्हा एका तबकडीवर पाठपोट दोनच गाणी रेकॉर्ड करत असत. या गाण्यामुळे त्यांच्या नातेवाईक व समाजात ते बऱ्यापैकी प्रसिद्ध झाले.

तो पर्यंत आपण स्क्रिन टेस्ट पण दिली होती, याचा विसर पडला होता. सहा महिन्यानंतर कलकत्त्याहून निरोप आला की, “तुम्ही स्क्रिनटेस्ट मध्ये पास झाला आहात आणि चित्रपटात भूमिका मिळाली आहे लगेच निघून या.” सय्यद इफ्तेखार मग कलकत्त्याला पोहचले. तीन वर्षांत चार चित्रपटात भूमिका करून हे रिलीजही झाले. नंतर भविष्यात सिनेसृष्टी या अभिनेत्याला ‘इफ्तेखार’ याच नावाने ओळखायला लागली.

वाचा : रफींना ऐकले की आजही वाटते, ‘तू कहीं आसपास हैं दोस्त’!

वाचा : महमूद : ‘किंग ऑफ द कॉमेडी’

खरे पोलीस सॅल्युट ठोकत

चित्रपटातील एखादे चरीत्र हेच त्याचे वैयक्तिक चरीत्र आहे, असं फार क्वचितच या चित्रपटसृष्टीत घडतं. इफ्तेखार आणि जगदिश राज हे दोन अभिनेते याला अपवाद ठरले. इफ्तेखार यानी चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस कमिशनरच्या इतक्यावेळा भूमिका केल्या की मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवरील हवालदार किंवा विमानतळावर ड्युटी करणारे खरे पोलीस या अभिनेत्याला खरोखरचा पोलीस कमिशनर समजून अनेकदा सॅल्युट करीत.

इफ्तेखार यांच्या व्यक्तिमत्वात ती छाप होती. प्रत्यक्षात पोलीस कमिशनरचा थेट जनतेशी कमीच संबंध येत असे. किमान ६० ते ८० पर्यंतच्या दशकात तरी असं होतं. त्यामुळे चित्रपटातला पोलीस कमिशनर हा ज्या व्यक्तिमत्वाचा असतो त्याचे प्रतिबिंब बहुदा इफ्तेखारच्या पर्सनॅलिटीमध्ये होते. नंतर तर अशा भूमिका करताना त्यांचे व्यक्तिमत्वच तसे बनले. निर्माते व दिग्दर्शकांची अशा भूमिकेसाठी पहिली पसंत इफ्तेखार असत.

कलकत्त्याला त्यांनी जे चार चित्रपट त्यांनी केले, ते म्हणजे ‘तकरार’, ‘घर’, ‘राजलक्ष्मी’ व ‘तू और मै’. या चारही चित्रपटात ते मुख्य नायक होते. १९४४चे ते वर्ष होते. या चित्रपटानंतर बराच काळ त्यानां संघर्ष करावा लागला. त्यात फाळणीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. कारण त्यांचे बरेच नातेवाईक व त्यांच्या कुटुंबातील भाऊ देखील पाकिस्तानात गेले. कलकत्त्यातही दंगली सुरू झाल्यामुळे मग ते मुंबईला आले. कारण मुंबईच फक्त त्यांना आता रोजीरोटी देऊ शकणार होती.

मुंबईत आल्यावर त्यांना त्यांच्या संगीताच्या वेडामुळेच काम मिळू शकले. १९५०मध्ये त्यांना मुंबईत संगीतकार अनिल विश्वास आणि अशोक कुमार यांच्या मदतीमुळे ‘मुकद्दर’ नावाच्या चित्रपटात त्यांना सेंकड लिड मिळाला आणि चित्रपटसृष्टीत खरोखरच त्यांचे मुकद्दर फळफळले.

राज कपूरच्या ‘श्री ४२०’ आणि ‘अब दिल्ली दूर नही’ व ‘पिंजरे के पंछी’ या चित्रपटातून सर्व प्रथम त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिका केल्या. मात्र राजेश खन्नाच्या ‘इत्तेफाक’ या चित्रपटात त्यांच्या शरीरावर जो हा युनिफॉर्म चढला तो नंतर त्वचेसारखाच त्यांना चिकटला.

१९७० ते ८० या दशकात मुंबईचे खरे पोलीस कमिश्नर कुणी का असेना, पण सगळयांना हेच पोलीस कमिश्नर वाटत असत. भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्यांना विनाकारण टाईप्ड् व्हावे लागले. हा खरं तर कुठल्या अभिनेत्याच्या कलाक्षमतेवर अन्यायच असतो.

निर्माते जेव्हा प्रेक्षकशरण जातात तेव्हा मग अनेक अभिनेते चौकटीत बंदिस्त होतात. तसे बघितले तर इफ्तेखार यांनी इतर देखील ज्या भूमिका केल्या त्या व्यक्तिरेखेत कठोरतेच्या छटा होत्या. मग ती भूमिका जज, डॉक्टर, वकील, ठाकूर, प्राचार्य, आर्मी ऑफिसर अशा जरी असल्या तरी त्यात हळवेपणा कमीच असे.

वाचा : ‘बाबूजी धीरे चलना…’ म्हणणारी सदाबहार शकीला

वाचा : सलमा आग़ा : बॉलीवूडने नाव ठेवले, तरी ठरली सुपरहिट गायिका

विविधरंगी भूमिका

‘शोले’मधील त्यांची जया भादुरीच्या वडिलाची छोटीशी भूमिका मात्र खूपच भाव खाऊन गेली. ‘जंजीर’मधला त्यांचा कमिश्नरही थोडा वेगळा वाटतो. ‘बंदिनी’, ‘सावन भादों’, ‘खेल खेल में’ व ‘एजंट विनोद’ या चार चित्रपटातील त्यांची निगेटिव्ह भूमिका होती.

‘दिवार’मधला भ्रष्ट कारखानदार मुल्कराज दावर मात्र निगेटीव्ह असूनही सहानुभूती मिळवून गेला. त्यांच्या उत्कृष्ट भूमिकेपैकी ही एक भूमिका. अशीच त्यांची भूमिका ‘डॉन’ या चित्रपटात पण होती.

चरीत्र अभिनेत्याची एक गोष्ट मात्र चांगली असते. त्यांना चित्रपटात कायम काम मिळत राहाते. नायक, नायिका वा खलनायक बदलले तरी यांना मात्र ते नको म्हणेपर्यंत भूमिका मिळत राहतात. त्यामुळे इफ्तेखार यांनी आपल्या ५० वर्षांच्या अभिनय प्रवासात ४०० चित्रपटातून काम केले.

विशेष म्हणजे त्यांनी ‘बॉम्बे टॉकिज’ (१९७०) आणि ‘सिटी ऑफ जॉय’ (१९९२). या दोन इंग्रजी चित्रपटातूनही काम केले. शिवाय १९६३मध्ये ‘माया’ नावाच्या अमेरिकन मालिकेतही भूमिका केली. इफ्तेखार यांना एखादा गरीब शेतकरी, मजूर वा विनोदी भूमिकेत बघितल्याचे आठवत नाही. अशा भूमिकांसाठी त्यांना कोणी विचारले असण्याची शक्यताही कमीच आहे.

बहुतांश चित्रपटात जरी कमिश्नर वा पोलीस इन्स्पेक्टर असले तरी त्यांचं चित्रपटातलं कुटुंब क्वचितच बघायला मिळालं. त्यामुळे अशी व्यक्ती घरात नेमकी कशी रियक्ट होत असेल हे प्रेक्षकांना कधी समजू शकले नाही. अशा प्रकारच्या भूमिकेत युनिफॉर्म हा खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतो. अर्धे काम हा युनिफॉर्मच करतो. मात्र हाच युनिफॉर्म नायकाच्या अंगावर चढतो तेव्हा मात्र त्याचे आयाम बदललेले असतात.

फार पूर्वी माझ्या वाचनात असे आले होते की त्यांचा ‘फाईव्ह पास्ट फाईव्ह’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नव्हता. कारण यात गांधीजींची हत्या केंद्रस्थानी होती. या चित्रपटात त्यांनी गांधीजींची भूमिका केली होती. खरोखर असा चित्रपट तयार झाला होता काय माहित नाही, पण त्यांच्या चेहऱ्याचा सुक्ष्म अभ्यास केला तर त्यांना ही भूमिका कदाचित सूट झाली असती. अर्थात हे माझे व्यक्तिगत मत आहे.

जर हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर कदाचित या भूमिकेमुळे ते नक्कीच चर्चेतही आले असते. असो. शेवटी सत्ताधारी आपापल्या इतिहासाची काळजी घेत असतात. इफ्तेखार यांनी कलकत्त्यातील हॅना जोसेफ नावाच्या ज्यू स्त्रीशी लग्न केले होते. लग्नानंतर हॅना ही रेहाना अहमद झाली. या दाम्पत्याला दोन मुली झाल्या. सादिया खान आणि सलमा जैन, पैकी सादिया अभिनेत्री आहे.

वाचा : रूपेरी पडद्यावर ‘नाच्या’ची परंपरा कशी सुरू झाली?

वाचा : गणपत पाटील : अभिनयाची शिक्षा भोगणारा खरा ‘नटरंग’

तोडली चौकटीत बंदिस्त

४ मार्च १९९५ रोजी इफ्तेखार यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्युनंतर १८ वर्षांनी रेहाना अहमद यांचे निधन झाले. इफ्तेखार यांची एक बहीण देखील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तजोर सुलताना हे त्यांचे नाव मात्र पड्द्यावरचे तिचं नाव होतं वीणा. तुम्हाला जर किशोर कुमारचा ‘चलती का नाम गाडी’ आठवत असेल तर त्यातील अशोक कुमारची ती प्रेयसी आहे.

१९६३मधील ‘ताज महल’ या चित्रपटात वीणाने मलिका-ए-आलम नूरजहाँची भूमिका केली आहे. या भूमिकेसाठी वीणाला उत्कृष्ट सहाय्यक कलावंताचा पुरस्कारही मिळाला.

चित्रपटसृष्टीमध्ये पार पूर्वीपासून अनेक ट्रेंड सेट होत आले. इफ्तेखारसाहेब त्यातील एक महत्त्वाची कडी होते. मानवी डोळे आणि कॅमेऱ्याचे डोळे यात एक महत्त्वाचा फरक म्हणजे कॅमेऱ्याचे प्रत्येक चित्र एका चौकटीत बंदिस्त असते. आम्ही जेव्हा समोरा-समोर संवाद साधत असतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीची एकच बाजू दिसत असते. मात्र कॅमेरा काही सेंकदातच अनेक बाजू दाखवू शकतो.

इफ्तेखार साहेब सगळ्याच बाजूनी पोलीस कमिश्नर वा पोलीस इन्स्पेक्टर दिसत. तसे तर त्यांनी मिलट्री ऑफिसर, न्यायाधिश, वकील, डॉक्टर अशाही भूमिका केल्या. त्यांचे व्यक्तिमत्व अशा पात्रात शोभून दिसे. ते चित्रपटात सिव्हील ड्रेसमध्ये जरी असले तर हे नक्की पोलीस अधिकारीच असणार असा अदमास प्रेक्षक लावत असत.

त्यांच्या नेमक्या याच छबीचा वापर करून ‘खेल खेल में’ नावाच्या चित्रपटात त्यांना चक्क मुख्य खलनायक करण्यात आले. या चित्रपटात शेवटपर्यंत प्रेक्षकांना ते इन्स्पेक्टर वाटतील, अशीच योजना केली होती. मात्र, शेवटी ते मुख्य खलनायक निघताच प्रेक्षकांचे अंदाज साफ कोसळून पडतात. मला वाटतं हा त्यांचा असा एकमेव चित्रपट असावा.

चित्रपटसृष्टीत अनेक योगायोग घडत आले आहेत. मुकेश यांना नायक म्हणून करीअर करायचे होते ते गायक झाले. आशा पारेख यांना डॉक्टर व्हायचे होते त्या अभिनेत्री झाल्या. दिलीपकुमारचा तर चांगला फळांचा व्यवसाय होता ते अभिनयाचे बादशाह झाले.

डॉ. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे, डॉ. जब्बार पटेल ही अशीच उदाहरणे आहेत. खरे तर इफ्तेखार साहेबांना गायक व्हायचं होतं, पण चित्रपटसृष्टीने त्यांना नेमके विरूद्ध दिशेला नेलं. गायक व्हायचं तर सूर आणि गळ्याचा नैसर्गिक आवाज याचा ताळमेळ बसवावा लागतो. पण चित्रपटसृष्टीने ‘सूरां’ऐवजी त्याना ‘सूट’ बहाल केला आणि ईफ्तेखार ‘उस्ताद’ऐवजी कमिश्नर झाले.

जाता जाता :