भारत-पाकमध्ये दोस्ती करू पाहणारे फिरोज अशरफ

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश भौगोलिकदृष्ट्या वेगळे असले तरी दोघांतील समाजजीवन आजही एकसारखेच आहे. दोन्ही देशातील राहणीमान, लोकजीवन, साहित्य, संगीत, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक व्यवस्था इत्यादी घटकात बरेच साम्य आढळते.

राजकीय संघर्ष आणि स्वार्थामुळे दोन देशातले लोक विभागले गेले आहेत. आजही दोन्ही देशात जनमत घेतले तर बऱ्याच जणांची मते एकत्र होण्याची गरज मांडणारी असतील. दोन्ही देशातील राजकारण्यांनी जर प्रामाणिक प्रयत्न केला तर जर्मनीसारखी मनभेदाची भींत पडायला अवधी लागणार नाही.

लेखकाचा हा विचार अतिशयोक्ती वाटू शकतो; पण हाच विचार घेऊन दोन्ही देशातील लोक गेल्या अनेक दशकांपासून कृतीशील आहेत. फिरोज अशरफ हे त्यापैकीच एक होते. ते गेल्या ५० वर्षांपासून भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक दुवा म्हणून कार्यरत होते. ७ जून २०१९ला मुंबईतल्या जोगेश्वरीत एका अपघातात वयाच्या ७७व्या वर्षी त्यांचं निधन झाले. ‘युद्ध नको शांतता हवी’ म्हणणारा एक सिद्धहस्त लेखक, विचारवंत, भाष्यकार फिरोज अशरफ यांच्या रूपाने देशाने गमावला आहे.

एक विचारवंत-लेखक अपघातात मृत्यू पावतो त्यावेळी ती त्याच्या कुटुंबाची व्यक्तिगत हानी नसते तर एकुण समाजाचे न भरून येणारे नुकसान असते. फिरोज अशरफ यांच्या बाबतीत ही संज्ञा लागू होते. अशरफ भारतातील गंगा-जमुनी सद्भावनेच्या परंपरेचे वाहक होते.

वारकरी संप्रदाय व सुफी संप्रदायाचे ते कर्ते सुधारक होते. तहयात त्यांनी भारतातील मिश्र संस्कृतीची मुळे (रुट्स) शोधण्याचं काम केलं. एखादा वसा घेतल्यासारखे त्यांनी हे कार्य हाती घेतलं होतं. त्यांच्या घरात त्यांनी विविध विषयावर केलेल्या कामाच्या बऱ्याच जुनाट फाईली रचून ठेवलेल्या आहेत. त्यांचे हे लेखन सामाजिक प्रबोधन व सुधारणेसाठी लागणाऱ्या विचारांचा अनमोल खजिना आहे.

मृत्युच्या आदल्या रात्री मित्रांची गप्पांची मैफल आटोपून ते घरी पोहचत होते. जोगेश्वरी स्टेशनला उतरुन त्यांनी घरी फोन लावून सांगितले की, १० मिनिटात पोहोचतो. स्टेशनपासून २०० मिटरवर असलेल्या अब्बा अपार्टमेंटमधील घरी जाण्यासाठी ते रस्ता क्रास करत होते. त्याचवेळी एका ऑटोचालकाने त्यांना धडक दिली. जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्यांनी जगाला अंतिम अलविदा केला.

मध्यरात्री त्यांच्या निधनाची बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. दै. भास्कर, जनसत्ता, हिंदुस्थान, मुंबई मिरर पासून ते बिझनेस स्टँडर्डपर्यंतच्या सर्वच अग्रणी वृत्तपत्रांनी फिरोज अशरफ यांना शब्द सुमनाने श्रद्धांजली अर्पित केली. दुसऱ्या दिवशी मालाड येथील कब्रस्तानात त्यांच्यावर दफनविधी पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांनी अशरफ यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थिती लावली होती.

वाचा : डॉ. दाऊद दळवी : एक व्यासंगी इतिहासकार

वाचा : कोकणी मुसलमानांचे पूर्वज ब्राह्मण होते का?

बिहारी ते मुंबईकर

२३ जुलै १९४३ला तत्कालीन बिहारच्या हजारीबागमध्ये फिरोज अशरफ यांचा जन्म झाला होता. फाळणीत त्यांचे अनेक नातेवाईक पाकिस्तानला निघून गेले. पण अशरफ यांचे कुटुंब मातीला चिकटून राहिलं. १९६५ला सेंट कोलंबस कॉलेजमधून बीएससी झाल्यानंतर पत्रकारितेच्या शिक्षणासाठी ते मुंबईला आले व मुंबईकर झाले.

भारतीय विद्या भवनमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला. १९६५ पासूनच त्यांनी लहान-मोठ्या दैनिकं व मासिकात लिखाण सुरू केलं. हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतं. या सर्व भाषांमध्ये ते सुधारणावाद, भारतीय राजकारण, सुफी-संत परंपरा, हिंदु-मुस्लिम सौहार्द आदी विषयावर हिंदी आणि उर्दू भाषेत लेखन करू लागले.

साप्ताहिक धर्मयुग या हिंदी वृत्तपत्रातून संपादक धर्मवीर भारती यांनी त्यांना ‘पाकनामा’ लिहिण्यासाठी निमंत्रित केलं. भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक संबध विकसित करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प या सदरातून अशरफ यांनी हाती घेतला. अल्पावधीत हे सदर प्रचंड लोकप्रिय झालं.

१९८५पासून याच विषयावर टाइम्स ग्रूपच्या मुंबई नवभारत टाइम्सने त्यांना ‘पाकिस्तान नामा’ लिहिण्यासाठी नियुक्त केलं. हे सदरही अपक्षेप्रमाणे प्रचंड लोकप्रिय झाले. वाचकांची मागणी वाढली तसं हे कॉलम देशभरात प्रकाशित होऊ लागलं. सुमारे २५ वर्षे हे सदर नवभारत टाइम्सने चालवलं. या काळात कितीतरी संपादक बदलले, पण कुणीही हे स्तंभ बंद केलं नाही. टाइम्स ग्रूपच्या इतिहासात २५ वर्षे अविरतपणे चालणारा हा एकमेव कॉलम ठरला.

फिरोज अशरफ हे हरफनमौला (अष्टपैलू) वृत्तीचे होते. त्यांनी विविध पातळ्यांवर सामाजिक कार्याची धुरा सांभाळलेली आहे. आपल्या लेखन कार्यासह त्यांनी १९६५ ते १९९७ पर्यंत इंडियन ऑईलमध्ये नोकरीदेखील केली. त्यांनी ट्रेड युनियनमध्ये महत्त्वाच्या पदावर सेवा बजावली.

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या युवक क्रांती दलाचे ते उपाध्यक्षही होते. मुंबई विद्यापीठात त्यांनी उर्दूच्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे धडेदेखील दिलेले आहेत. तसेच अनेक सामाजिक संघटनांचे ते प्रवर्तकही होते. सेक्युलॅरिझम, राष्ट्रवाद, शिक्षण आदी विषयावर त्यांनी संघटना बांधणीदेखील केलेली आहे.

वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार

वाचा : उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व

मराठी हिंदी, आणि उर्दूत लेखन

उर्दू भाषेतही त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. तसंच मराठीतही त्यांनी लिहिलेली सदरे वाचकप्रिय ठरली. अशरफ यांनी अनेक टीव्ही मालिकांसाठी लेखनही केलेलं आहे. त्यात दूरदर्शनवरील ‘बाबाजी का बाईस्कोप’, ‘ग्लोबलायझेशन’, ‘दंगली’, ‘घर घर की बात’ इत्यादी मालिका व डॉक्युमेंट्रीसाठी त्यांनी संहिता लेखन केलं.

लोकप्रिय सुरभी मालिकेसाठी त्यांनी १० वर्षे त्यांनी लेखन केलं. १९९६ साली दूरदर्शनवर गाजलेल्या ‘मई दिवस’ कार्यक्रमाची पटकथा त्यांनी लिहिलं आहे. याशिवाय ते ऑल इंडिया रेडिओ, विविध भारतीमध्ये अनेक हिंदी, उर्दू टॉक शो आणि अन्य दिनविषेश कार्यक्रमांची रुपरेषाही तयार केली आहे.

मराठीतली प्रतिष्ठित मासिके व नियतकालिकातूनही ते लिहित असत. सत्याग्रही, परिवर्तनाचा वाटसरू, महाराष्ट्र आदी मासिकातून त्यांनी भारतीय राजकारण, दहशतवाद, स्वातंत्र्य चळवळ, हिंदुत्ववाद, इस्लाम इत्यादी विविध विषयावर दर्जेदार लेखन केलेलं आहे. त्यांनी पाकिस्तानवरील लेखातून मराठी भाषकांना पाकिस्तानची नव्याने सांस्कृतिक व साहित्यिक ओळख करून दिली.

‘सुफी परंपरा’ आणि ‘मुस्लिम समाज’ हे त्यांच्या आत्मियतेचे विषय. सुफी परंपरेशी त्यांचा जवळचा संबंध. त्यांचे पूर्वज बिहारच्या सुप्रसिद्ध सुफी घराण्याशी संबंधित होते. त्यांच्या मते भारतात सुफींच्या नावाने केली जाणारी मांडणी फार वरवरची असते.

मुस्लिम समाजाबद्दल त्यांचे मतही इतरांपेक्षा वेगळे होते. त्यांच्या मते, सत्ता लालसेपोटी भारतात आलेले परकीय मुसलमान हे ‘भारतीय’ कधीच नव्हते. पानवाला तांबोळी, दातवण विकणारा आत्तार, रजाई विणणारा पिंजारी, बांगड्या विकणारा मनियार, हातरिक्षा चालवणारा, अंडी विकणारा, पंम्चर काढणारा, बिगारी मजुरी करणारा, शेती करणारा हा भारताचा खरा मुसलमान आहे.

भांडी बनविणारा, नक्काशी काढणारा, हस्तकलेत पारंगत, रफू-शिलाई करणारा मुस्लिम भारतातील बहुसांस्कृतिक व वैविध्यपूर्ण समाजरचनेचा अविभाज्य भाग असल्याचं त्यांचं मत होतं. भारताच्या या ‘खऱ्या’ मुसलमानांची ओळख दर्शवणारा महत्त्वाकांक्षी ग्रंथ ते गेल्या काही वर्षांपासून लिहित होते. हिंदी आणि उर्दू भाषेतील या ग्रंथात बिहार, उत्तरप्रदेश, केरळ आणि महाराष्ट्र या चार राज्यातील सर्जन व कारागीर मुसलमान त्यांनी शब्दांकित केलेला आहे.

त्यांच्या मते, भारतातला मुसलमान हा प्रदेशनिहाय वेगळपण जपणारा आहे. इथला मुसलमान वर्ग तुर्कस्तानच्या खिलाफतशिवाय अन्य देशातील घटना-घडामोडींवर फारसा विचार करत नाही. महाराष्ट्रातील मुस्लिम गुजरातमधील मुस्लिम समुदायाच्या प्रश्नांशी अलिप्त असतो. तसेच बिहारच्या मुसलमानांना केरळच्या मुस्लिमांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नसते. प्रत्येकजण वेगवेगळ्या समस्याना घेऊन जगत आहे. प्रत्येक राज्यात शिक्षण, रोजगार, सामाजिक सुरक्षा अशा प्रश्नांशी दोन हात करण्यात स्थानिक मुस्लिमांचा वेळ जातो.

राज्यां-राज्यात मुस्लिमांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत, असं त्यांचं मत होतं. प्रा. इम्तियाज अहमद, डॉ. मोईन शाकिर, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्यानंतरचे फिरोज अशरफ हे भारतीय मुसलमानांचे वस्तुनिष्ठ समाजशास्त्रीय आकलन करणारे एकमेव भाष्यकार होते.

वाचा : सावरकरांच्या हिंदुराष्ट्रात वंचितांचे स्थान काय असेल?

वाचा : हिटलरच्या आत्महत्येचा तो शेवटचा क्षण!

मुंबई दंगलीच्या वेदना

१९९३च्या मुंबई दंगलीत त्यांना मालाडचे घर विकून जोगेश्वरीला स्थलांतरित व्हावं लागलं. १९९३ नंतर ते प्रथमच मुस्लिम वस्तीत आले. नाईलाजाने त्यांना मुस्लिम वस्तीत घर घ्यावं लागलं. दंगलीने त्यांना आपली घर सोडावं लागलं होतं. हा धक्का त्यांच्यासाठी मोठा आघात होता.

ते नेहमी म्हणायचे की, ‘मुंबईच्या दंगलीने मला होळीच्या रंगापासून विभक्त केलं आहे.’ पण त्यावर अश्रू ढाळण्यापेक्षा त्यांनी मुस्लिमांच्या वाढणाऱ्या घेट्टो (सुरक्षित निवासी कंपू)वर संशोधन केलं. घेट्टो वाढण्याची सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कारणे त्यांनी शोधून काढली. मुस्लिमांच्या स्वतंत्र वस्त्यांवर त्यांनी केलेलं काम प्रशंसनीय आहे. या कामावर ‘टाटा इन्स्टियूट ऑफ सोशल सायन्स’च्य़ा (TISS) विद्यार्थ्यांनी पीएचडी व एमफीलचे संशोधन केलेलं आहे.

सुफी परंपरेवर त्यांनी केलेलं लेखन अतुलनीय आहे. अमीर खुसरो, निजामुद्दीन औलिया, ख्वाजा गरीब नवाज, बख्तियार काकी इत्यादी सुफी संताचे बहूमुल्य विचार त्यांनी आपल्या लेखनीतून वाचकांपर्यंत पोहोचवले.

वास्तविक पाहता, भारतात गेल्या अनेक शतकांपासून सुफी परंपरेचा मोठा प्रभाव आहे. भारतातला इस्लाम हा सुफी इस्लाम आहे. देशभरात सुफी संतांच्या मजारीची संख्या मोठा आहे. तिथे उर्स, संदल आणि कव्वालीची मैफल सजत असते. देशभरातून सर्वधर्मीय भाविक तिथे जाऊन मजारीवर भक्तिभावाने दानधर्म करत रेशमी फुलांची चादर चढवतात.

या सुफींच्या दरगाहवर येऊन मुसलमानांसह हिंदू बांधवही नवस बोलतात, कंदुरी करतात, अन्नदानासाठी रांगा लावतात. सुफी परंपरेने हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई असा भेदभाव केला नाही. तोच विचार इथल्या मानवी समाजात आलेला आहे.

सुवर्ण मंदिरात शिखांसह अनेक मुस्लिम व हिंदू बांधवही भक्तिभावाने भेटी देतात. दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन, मुंबईतील हाजी अली, नागपूरच्या ताजुद्दीन बाबा, परभणीच्या तुराबुल हक दर्गात भेट देणाऱ्यामध्ये मुस्लिमांची कमी पण गैरमुस्लिमाची संख्या मोठी आढळून येते. हाच माझा भारत देश आहे. भारताच्या संमिश्र व बहुरंगी संस्कृतीचा खरा वारसा हाच तर आहे.

वाचा : प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : संवेदनशील आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक

वाचा : दंगलीतून सहिष्णुता अंगीकारण्याचा बोध घ्यावा

भारत-पाक मैत्रीचे शांतीदूत

सामाजिक सौहार्द व सद्भावनेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. भारत पाकिस्तानमधील राजकीय संबध दुरूस्त व्हावेत यासाठी त्यांनी त्यांच्या पातळीवर अनेक प्रयत्न केले. भारत-पाक मैत्रीचे ते शांतीदूत होते. त्यांनी अनेकवेळा पाकिस्तानचा दौरादेखील केला होता. तिथं जाऊन त्यांनी भारताच्या बहुसांस्कृतिकतेची महती गायली आहे. पाकिस्तानी लोकांसमोर स्वत:ला भारतीय म्हणवताना त्यांना गर्व होत असे.

गरीब व निराश्रित बालकांसाठी ते ‘टिचर फिरोज अंकल’ होते. त्यांच्या पत्नी आरफा अशरफ यांनी एकदा मला सांगितलं होतं, बिल्डिंगमधला गरीब चौकीदार आपल्या मुलीसाठी ट्यूशनचे पैसे भरू शकत नव्हता. ही अडचण त्याने अशरफ यांना सांगितली. अशरफ यांनी चौकीदाराच्या मुलीला इंग्रजी शिकवण्याचं कबुल केलं. त्या मुलीसोबत इतरही मुली मोफत ट्यूशनसाठी येऊ लागल्या.

अशा पद्धतीने त्यांनी झोपडपट्टीतल्या गरीब मुलांना शिकवण्यासाठी ‘अंकल क्लासेस’ सुरू केलं. गरीब मुलांना पूर्णवेळ शिकवता यावं यासाठी त्यांनी १९९७मध्ये इंडियन ऑईलमधील नोकरीचा राजीनामा दिला. १९९७ पासून ते गेली ३० वर्षे अखंडपणे गरीब मुलांना विनामोबदला शिकवत होते.

सरकारी शाळेत गणित, विज्ञान आणि इंग्रजी शिकवण्याच्या उदासीन धोरणांचा ही गरीब मुले बळी होती. फिरोज अशरफ यांनी या मुलांना अवघड विषयाची सोपी अध्ययन पद्धती शिकवली. त्यांच्या पत्नी मुंबई महापालिकेत नोकरीला होत्या. त्यांनीही निवृत्तीनंतर या गरीब मुलांना शिकवण्याच्या कामात हातभार लावला.

लोकांमध्ये फिरून वर्गणी जमा करून ते ह्या मुलांसाठी वह्या, पेन आणि पुस्तकांची व्यवस्था करत. अशा प्रकारे अशरफ यांनी अनेक शाळाबाह्य मुलांना शिक्षित केलेलं आहे. अशरफ यांनी आत्तापर्यंत तब्बल ५ हजार विद्यार्थ्यांना ट्यूशन शिकवली आहे.

सुधिंद्र कुलकर्णी संचलित ‘ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन’ने (ORF) अशरफ यांच्या क्लासेसवर ‘अंकल-द स्कूल इन हिमसेल्फ’ नावाची डाक्यूमेंट्री आणि एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. त्यांच्या शिक्षण सुधार धोरणांवर विशेष परिसंवादाचे आयोजनही या संस्थेने केलेलं होतं.

२००१ साली अशरफ यांच्या या शैक्षाणिक धोरणांच्या प्रचारासाठी युनिसेफने त्यांना टोकियोमध्ये आमंत्रितही केलं होतं. याशिवाय सार्क देशाचा दौराही त्यांनी केला होता. वयाच्या सत्तरीही ते लेखन व समाजकार्यासाठी सक्रिय असत. भाषणासाठी मुंबईभर फिरत.

अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे ते एका संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या गरीब व निराश्रित लोकांसाठी धर्मादाय हॉस्पिटलचे ते विश्वस्त होते. त्यांच्या विविध कामांची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही मिळालेले आहेत. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीसारखा सन्मानही त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांच्या कामाची दखल देश-विदेशात मीडिय़ा संस्थानी घेत त्यांच्या विशेष लेखही प्रकाशित केलेली आहेत.

अलीकडे माझ्या संपादन कामामुळे फिरोज अशरफ यांच्याशी संपर्क वाढला होता. फोन लावला की ते नेहमी म्हणायचे, “बेटा, फुरसत मिली ते आना मेरे घर. बैठकर गप-शप लडायेंगे.” शेवटची भेट मृत्युच्या १५ दिवसांपूर्वीच झाली होती.

मागच्या दोन्ही वेळी ते मुंबई विद्यापीठात लेक्चरमध्ये व्यस्त असल्याने आमची भेट झाली नाही. पण या मुंबई भेटीत मुद्दामहून जोगेश्वरीला गेलो होतो. त्यांनी व त्यांच्या पत्नीने माझा चांगलाच पाहुणचार केला होता. दोघा पती-पत्नीने प्रेमाने मला जेवू घातले. जेवणानंतर मराठवाड्यातील कवी आणि शायरांचे बंधूंनी लिहिलेलं उर्दू पुस्तक त्यांना दिलं. पुस्तक पाहून खूप कौतुक केलं. संदर्भ ग्रंथ म्हणून मी विविध संस्थाना अभ्यासक्रमात लावायला सांगतो म्हणाले.

त्यानंतर त्यांची व्यक्तिगत लायब्ररी दाखवली. लिहिलेलं साहित्य, पूर्ण झालेलं, प्रकाशनाला गेलेलं असं बरेच काही बाड ते दाखवत होते. त्यांनी लिहिलेली कागदं उत्साहाने काढून दाखवली.

लिहित असलेलं नवीन पुस्तक समोर ठेवलं. आम्ही बराच त्यांच्या नव्या पुस्तकावर बोलत राहिले. हिंदी आणि उर्दू भाषेत एकाच वेळी ते येणार होते. बराच वेळ समकालीन घडामोडींवर गप्पा मारल्या. निवडणुका, प्रचार, भाजप, इस्लाम, बिहारी-मराठी मुसलमान, सुफीझम इत्यादी विषयांवर भरभरून बोललो.

त्यांनी रचलेल्या कविता व शायरी वाचून दाखवल्या. सत्याग्रहीच्या आगामी अंकासाठी लोकसभेच्या निवडणुकांवर राजकीय विश्लेषण लिहून देतो म्हणाले. निघताना गेटपर्यंत सोडायला आले. पुन्हा लवकरच भेटू म्हणत मी त्यांचा निरोप घेतला.

एका सकाळी फोनवरून मुंबईतल्या मोठ्या भय्याने बातमी कळविली. ऐकताच सदमा लागला. काहीच सूचत नव्हते. अशरफ अंकल लेख न देताच शेवटच्या प्रवासाला निघून गेले होते. अशा अष्टपैलू आणि सिद्धहस्त पत्रकार, लेखक, विचारवंत, संघटक आणि समाजसेवकाला एका वाचकाची खिराजे अकीदत.

जाता जाता :