सम्राट अशोक ‘महान’ होतो, मग टिपू सुलतान का नाही?

पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित २०१५ साली एका कार्यक्रमासाठी बंगळुरू येथे आले होते. मीही त्याच कार्यक्रमाला गेलो होतो. मी त्यांना यापूर्वीदेखील भेटलो होतो. त्यांना विचारले होते, दक्षिण भारतात त्यांचा काय बेत आहे?

माझ्या माहितीप्रमाणे बंगळुरूला भेट देण्याची परवानगी मिळालेले पाकिस्तानचे ते एकमेव किंवा दुसरे उच्चायुक्त असावेत. ते म्हणाले, “मी शहरात काही टेक्नो पार्क पाहणार आहे. शिवाय मला म्हैसूरलादेखील जायला आवडेल.”

तिथून ते २ तासांवर आहे. म्हैसूरला जाऊन त्यांना श्रीरंगपट्टणम इथला टिपू सुलतानचा राजवाडा पाहायचा होता. म्हैसूरच्या बाहेर असलेला. बासित यांना वाटत होते की सर्वच भारतीयांना टिपू सुलतानबद्दल अभिमान असणार. पण अर्थातच अलीकडच्या घटना पाहता लक्षात येते की त्यांचा हा समज खोटा होता.

कर्नाटकमध्ये टिपू सुलतानचा वाढदिवस साजरा करण्यास काही संघटनांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना बळाचा वापर करून पांगवले. पोलिसांनी गोळीबारही केला. त्याचे पर्यवसान दोन माणसांचा मृत्यू ओढवण्यात

झाले.

वाचा : खुल्ताबादचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा

वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’!

संदर्भ ग्रंथाचा वानवा

अलीकडे भारतात अनेक गोष्टी अकारण हिंदू-मुस्लिम वादाचे रूप घेतात. भारतामध्ये राजेरजवाड्यांना चांगले आणि वाईट अशा दोनच वर्गीकरणांत विभागले जाते. म्हणजे अशोक, अकबर हे चांगले आणि औरंगजेब, टिपू सुलतान हे वाईट. समाजाने तयार केलेला हा एक मापदंड आहे. त्यावरून लक्षात येते की आपला देश हा इतिहासाकडे तथ्यांनुसार किंवा तर्काने पाहत नाही, तर भावनेने पाहत असतो.

असा विचार करणाऱ्या नागरिकांपैकी अनेक जण अशिक्षित आहेत किंवा थोडेफार शिकलेले आहेत हेही सत्य त्यातून ठाशीवपणे समोर येते. टिपू सुलतान आणि त्याच्या सेनापतीविषयी असे काही बोलण्यात येते की, जणू काही त्यांनी हिंदूंच्या विरोधात जिहादच आरंभला होता.

मुळात अशा प्रकारच्या माहितीत व त्याआधारे होणाऱ्या वक्तव्यात काहीच तथ्य नाही. खरे सत्य काय याचे विवेचन करणे स्थळाअभावी इथे शक्य नाही. मात्र, टिपू सुलतानबद्दल नुसतीच चर्चा करत राहण्यापेक्षा इतिहासाची पुस्तके वाचून कोणाही व्यक्तीने अंतिम निष्कर्ष काढला पाहिजे.

मुख्य प्रश्न हा आहे, भारतामध्ये या संदर्भात फार कमी पुस्तके लिहिली गेली आहेत. जगातील इतर सुसंस्कृत भागात अशी परिस्थिती नाही. आपल्याकडे चरित्र लिहिण्याची किंवा डायरी ठेवण्याची परंपरा नाही.

भूतकाळाबद्दल नवनवे संशोधन करून नवीन पुस्तके लिहावीत असे प्रयत्न आपल्याकडे फार होताना दिसत नाहीत. त्यामुळे टिपू सुलतानवर भारतीयांनी लिहिलेली पुस्तके फारशी नाहीत. जर कोणाला १९व्या शतकात टिपू सुलतान किंवा हैदर अलींवर लिहिलेली पुस्तके वाचायची असेल तर त्यांना इंग्रजी ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो.

दक्षिणेकडील टिपू सुलतान व मुस्लिम साम्राज्याचा संघर्षावर लुईस बॉवरिंग यांचे ‘हैदर अली, टिपू सुल्तान एंड स्ट्रगल ऑफ़ मुसलमान पॉवर्स ऑफ़ साउथ’  एक चांगले पुस्तक आहे. लेखकाचे नाव बंगळुरूमधील सेंट मार्क रोडवरील बॉवरिंगमुळे अनेकांना माहीत आहे. आपल्या देशातील सुजाण लोकांनी अशी पुस्तके मिळवून ती आवर्जून वाचली पाहिजेत.

वाचा :  बाबर : सुफी परंपरेवर अत्याधिक निष्ठा ठेवणारा राज्यकर्ता

वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

तीन महत्त्वाचे घटक

मला टिपूबद्दल दोन-तीन घटक महत्त्वाचे वाटतात. पहिले म्हणजे इंग्रजांना त्याचा पराभव करणे फार जड गेले. जेव्हा आपण त्या काळाबाबत जदूनाथ सरकार या इतिहासकाराचे लेखन वाचतो तेव्हा लक्षात येते की मराठ्यांप्रमाणे टिपू सुलतान हा योद्धा होता. मात्र, तो काही बाबतीत मराठ्यांसारखा नव्हता.

मराठ्यांचे सैन्य पानिपत युद्धात पराभूत झाले व नंतर मराठेशाही कोसळली. ते सारे पाहता टिपू सुलतानाने दिलेला लढा हा तुलनेने अधिकच मोठा वाटतो. या साऱ्या गोष्टी ४० वर्षांच्या आत घडल्या. म्हणजे १७६१ मध्ये जेव्हा मुहंमद अब्दालीने पानिपत जिंकले तेथपासून १७९९मध्ये टिपूचा मृत्यू होईपर्यंतच्या घटनांचा विचार इथे अपेक्षित आहे.

या मोजक्या वर्षांत इंग्रजांनी आपल्या शत्रूंना संपवले, पण टिपू आणि पंजाब यांना ते पराभूत करू शकले नाहीत. पंजाब मात्र रणजितसिंगच्या मृत्यूनंतर काही दशकांत आपोआप शरण गेला. परंतु एक तो टिपूच होता, ज्यामुळे इंग्रजांना त्याचा प्रबळ प्रतिकाराचा सामना करावा लागला.


टिपू फार शूर जनरल होता. त्याला भूगोल, इतिहासाची उत्तम जाण होती. त्याआधारे राजकारणात टाकले जाणारे डावपेच त्याला अचूक माहिती असत. जसे इंग्रजांच्या विरोधात फ्रेंचाचा वापर करणे, याला जिओपॉलिटिक्स म्हणतात. फ्रेंचांना तो ब्रिटिशांविरुद्ध खेळवू शकायचा. त्याचा लढाईबद्दलचा दृष्टिकोन आधुनिक होता.

दुसरी बाब म्हणजे, टिपूचे सैन्य सुरुवातीच्या काळातले असे पहिले सैन्य होते, ज्यांनी युद्धात रॉकेटचा वापर केला. त्यांचे शिपाई रॉकेटमध्ये ब्लेड लावत असत. या ब्लेडमुळे रणांगणात शत्रूंवर फायर करणे सोपे जात.

टिपूच्या फराभवासाठी ब्रिटिश इतिहासातील सर्वात महान योद्धा आर्थर वेलेस्लीचे सहकार्य घ्यावे लागले. वेलेस्लीला आम्ही ‘ड्यूक ऑफ़ वेलिंगटन’ नावाने ओळखतो. त्याने नंतरच्या काळात वाटरलूच्या युद्धात नेपोलियनचा पराभव केला होता.

टिपूच्या युद्धकौशल्यामुळे त्याला मिळालेल्या क्षेत्रीय किंवा राष्ट्रीय यशाकडे लोक डोळेझाक करतात याचे मला वाईट वाटते. त्याच्याबद्दल नेहमी एक बाब स्मरण केली जाते, ती म्हणजे त्याने किती हिंदू लोकांना मारले किंवा धर्मांतर केले. ही माहिती खरी आहे की खोटी याबद्दल लोकांना काही देणे-घेणे नसते.

वाचा : पुस्तकातून उरलेला बाबरी-आयोध्यावाद

वाचा : इतिहासाच्या भगवेकरणाचा प्रयत्न

अशोक आणि टिपू

सम्राट अशोकासारख्या राजाने कलिंगा जिंकल्यानंतर काही विदेशी नागरिक किंवा मुस्लिमांना ठार मारले नाही तर त्याने आपलेच लोक ठार मारले. ओरिया भाषा बोलणाऱ्या हिंदूंनाच लाखोंच्या संख्येने त्याने क्रूरतेने ठार मारले. या कथा आपण आपल्या इतिहास कथांमधून घेत आलो आहोत.

तरीही अशोकाला ‘महान’ म्हटले जाते. त्याचे ‘सिंहस्तंभा’चे प्रतीक हे भारताचे अधिकृत चिन्ह आहे. भारतीय झेंड्यातील गोल चक्राला आपण अशोक चक्र मानतो. कारण तो त्याचे चिन्ह आहे.

मग प्रश्न असा येतो, आम्ही अशोकाला एवढा मान देतो तर टिपूला का देत नाही? तसे पाहिले तर दोघांनीही एकाच तऱ्हेचा गुन्हा केलेला आहे. याचे उत्तर सोपे आहे. हिंदू राजाने जे केले तेच मुस्लिम राजाने केलेले चालत नाही.

हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी क्लिक करा

महाराजा आला सिंगने पतियाळाचा मोठा राजवाडा बांधला. त्याच्या आयुष्यात युद्धाच्या उपलब्धी शून्य आहेत. त्याने युद्धात कधीच मोठा विजय मिळवला नाही तरीही आला सिंह बलवान झाला. कारण त्याने मराठ्यांना पराभूत करायला अब्दालीला मदत केली. त्याला अफगाण शासकांनी पुरस्कृत केले. आता आला सिंगला किंवा त्यांच्या वंशजांना कुणी देशद्रोही म्हणून पाहतो का?

पतियाळाच्या या राजाने महाराजा रणजितसिंगला सतत विरोध केला. पण कुणीही त्यांना राष्ट्रद्रोही मानत नाही. आपल्याकडे अशी वागणूक फक्त मुस्लिम राजाच्या बाबतीते केली जाते.

(हा लेख सर्वप्रथम नोव्हेंबर २०१५ साली बीबीसीमध्ये प्रकाशित झालेला होता.)

जाता जाता :