पॉलिटिकल इस्लामप्रणित समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

भारतात इस्लामी तत्त्वज्ञानाच्या आणि त्याच्या इतिहासाच्या तत्त्वज्ञानीय चर्चेची सुरुवात सर सय्यद अहमद खान यांनी केली. इस्लाम जीवनाचं तत्त्वज्ञान आहे, हे समजून घेतल्यानंतर सर सय्यद यांनी त्याची मांडणी अनेक भौतिक तत्त्वज्ञानांप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. पण सर सय्यद हे मुळचे कृतीशील समाजसुधारक होते. लेखन आणि संशोधन हे काही त्यांचं मुख्य ध्येय नव्हतं. त्यामुळे त्यांना मर्यादा आल्या.

सर सय्यद यांच्यानंतर इस्लामी तत्त्वज्ञानाविषयी सामाजिक मुल्यभान जपणारे लेखन केले ते डॉ. मुहंमद इकबाल यांनी. त्यांच्या ‘रिकंस्ट्रक्शन ऑफ रिलिजियस थॉट इन इस्लाम’ या ग्रंथाने इस्लामी चिंतनाच्या नव्या चर्चेला सुरुवात केली. सर सय्यद आणि इकबाल यांच्यानंतर इस्लामी तत्त्वज्ञानाच्या श्रेष्ठ विचारवंतांमधे मौलाना आझाद यांचा समावेश होतो.

आझादांनी लिहिलेल्या ‘तर्जुमान अल् कुरआन’ या ग्रंथाला जागतिक पातळीवरील इस्लामी अभ्यासकांत मान्यता मिळाली. मात्र या तीन विचारवंतांच्या नंतर इस्लामी तत्त्वज्ञानाची सामाजिक, आर्थिक, भौतिक, राजकीय भूमिका समजावून सांगण्याचा दखल घेण्याइतका प्रयत्न कुणी केल्याचं आढळत नाही. फाळणीनंतर इस्लामी तत्त्वज्ञानाचे अनेक अभ्यासक पाकिस्तानात गेले. त्यानंतर या क्षेत्रातील अभ्यासाला प्रचंड मर्यादा आल्या.

फाळणीच्या दोन दशकांनंतर उत्तर प्रदेशच्या शेख सफिऊर रहमान मुबारकपुरी यांनी या मर्यादा ओलांडल्या. त्यांनी लिहिलेल्या ‘अर्ररहिकुल मक्तुम’ या इस्लामी इतिहासावरील ग्रंथाला प्रेषित चरित्रावरील जागतिक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला. त्यांच्या या ग्रंथामुळे मार्दिन इथल्या एका इस्लामी विद्यापीठाने त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली.

वाचा : मुहमंद पैगंबरांचे श्रमावर आधारित बाजारांचे व्यवस्थापन

वाचा : मदीनेत इस्लामी सभ्यतेचे आगमन कसे झाले?

इस्लामी इतिहासाचे वस्तुनिष्ठ साधन

‘अर्ररहिकुल मक्तुम’ची अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. अलीकडे सोलापूरचे प्रा. मीर इसहाक शेख यांनी त्याचं `कुपीबंद अमृत` या नावाने मराठीत भाषांतर केलं. प्रा. शेख मराठीचे निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘उर्दू-मराठी राष्ट्रीय कविता’ या विषयावर कोल्हापूर विद्यापीठातून पी.एचडी. केलीय. त्या विषयावरील काही पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत. प्रा. शेख यांनी अत्यंत उद्बोधक अशा मराठीत या ग्रंथाचं भाषांतर करून मराठी भाषकांसाठी इस्लाम समजून घेण्यासाठी इस्लामी इतिहासाचं एक वस्तुनिष्ठ साधन उपलब्ध करुन दिलं आहे.

इस्लामचा अभ्यास ‘धर्म’ म्हणून करणाऱ्या सर्वच विद्वानांनी त्याच्या जन्माच्या मुळाशी असणाऱ्या आर्थिक कारणांची चर्चा अभावानेच केली. मक्का शहरातील उत्पादन व्यवस्थेत इस्लामोत्तर झालेले बदल हा विषय अभावानेच धर्मवादी अभ्यासकांना आकर्षित करू शकला. त्यामुळे इस्लामच्या आधीही प्रेषितांनी ‘हिल्फुल फुदुल’ कराराच्या माध्यमातून आर्थिक शोषणाच्या विरोधात दिलेला लढा हा इस्लामी इतिहासातून दुर्लक्षित राहिला.

मक्का शहरात प्रेषितांच्या जन्मापूर्वी आर्थिक विषमतेने सामाजव्यवस्थेला पोखरून काढलं होतं. मक्का शहराचा हा प्रेषितपूर्व इतिहास मांडताना धर्माचे अभ्यासक त्या काळाला ‘दौर ए जाहिली’ म्हणजे अज्ञान युगाचा काळ संबोधून पुढे सरकतात. त्यावर चर्चा केलीच तर ते अंधश्रद्धा, रुढी आणि कर्मकांडांची करतात. शहरातील आर्थिक शोषणाच्या इतिहासाला त्यांच्या लिखाणात स्थान नसते.

वाचा : जेव्हा मौलाना रुमी आपल्यातील ‘मी’ला नष्ट करतात!

वाचा : रोगराईतील ‘अस्थायी वास्तविकते’च्या कालखंडातील ‘ईद’

इस्लाममधील मुहंमदी परिवर्तन

फिलीप के हित्ती यांच्यासारख्या आधुनिक इतिहासकारांनी मक्का शहराचा प्रेषितपूर्व इतिहास मांडण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत. त्यांचा ‘हिस्ट्री ऑफ अरब’ हा ग्रंथ सामाजिक कारणांचा शोध घेऊन तिथे घडलेल्या ‘मुहंमदी परिवर्तनाची’ व्याख्या करतो. मॅक्झिम रॉडिन्सन ‘कॅपिटलिझम अँड इस्लाम’मधे इस्लामी अर्थक्रांतीच्या मुळाशी असणारी परिस्थिती कथन करतानादेखील हित्ती यांच्यासारखी सुरुवात करतात. मात्र त्यांच्या मांडणीचा हेतू, आशय आणि सुत्रं वेगळी असल्याने ते लिखाण इस्लामी इकॉनॉमिक सोशिओ रिवोल्युशनला अधोरेखित करत नाही.

शेख सफिऊर रहमान मुबारकपुरी यांनी इस्लामचा जन्म ज्या सामाजिक परिस्थितीतून झाला, त्याचा आढावा घेतलाय. अरब भुप्रदेशाचे भौगोलिक स्थान, त्याचा सामाजिक, राजकीय, धार्मिक इतिहास मुबारकपुरी यांनी अत्यंत सखोल परिश्रम घेऊन मांडला आहे. इस्लामपूर्व अरब समाजातील चालीरिती आणि त्यातून होणारे मानवी समाजाचे शोषण याचे अनेक संदर्भ या ग्रंथातून समोर येतात.

इस्लामपूर्व विवाहाच्या पद्धती, सामाजिक जीवनातल्या रीती, परंपरा, अंधश्रद्धेतून होणारे आर्थिक शोषण, हत्या, लूट यातून आकाराला आलेली भयावय अवस्था, समाजातल्या निम्नवर्गीयांची होणारी मानखंडना, त्यांचं समाजातलं सन्मानाचं स्थान हिरावण्याची शोषणप्रक्रिया याची माहिती देण्यासाठी मुबारकपुरी यांनी तत्कालीन अरबी जीवनाच्या अनेक मध्ययुगीन अभ्यासकांचे दाखले दिले आहेत.

वाचा : ज्ञान साधनेची महती सांगणारा रमज़ान

वाचा : ‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञाता’चा शोध

प्रेषितपूर्व अरब इतिहास

सामान्य लोकांमधे पैंगबर मुहंमद (स) हे इस्लामचे संस्थापक असल्याचा एक भ्रम शतकानुशतके रूढ आहे. कुरआनने हा समज खोडून काढला आहे. इस्लामची सुरुवात प्रेषित हजरत आदम यांच्यापासून मानली जाते. त्यामुळे इस्लामचे अनेक इतिहासकार इस्लामचा इतिहास मांडताना जगाच्या निर्मिती क्षणापासून सुरुवात करतात.

मुबारकपुरी यांनी त्यापेक्षा वेगळी पद्धत वापरली आहे. त्यांनी अरबी समाजाचा इतिहास सांगताना प्रेषित इब्राहिम यांच्यापासून मांडणी केली आहे. मक्का शहर कशापद्धतीने वसले त्याची वस्तुनिष्ठ माहिती या ग्रंथातून मुबारकपुरी यांनी दिलीय. या ग्रंथात एका ॲकेडमिक अभ्यासकांप्रमाणे मुबारकपुरी संदर्भ साधने हाताळतात. इब्ने हिशामपासून इब्ने खल्दुनपर्यंतच्या अनेक इतिहासकारांच्या ग्रंथांच्या नोंदी त्यांनी घेतल्या आहेत.

प्रेषित इब्राहिम यांच्या अंधश्रद्धाविरोधी चळवळीनंतर अरब समाजात पुन्हा अंधश्रद्धा कशी वाढीस लागली त्याचा घटनाक्रम त्यांनी मांडलाय. या काळातल्या प्रेषित इस्माईल यांच्यापासून अनेक प्रेषितांच्या इतिहासाचा त्यांनी आढावा घेतला. हा इतिहास मांडताना अनेक अरब द्विपकल्पातील अनेक प्रदेशांचा सामाजिक, राजकीय इतिहास येतो. अनेक लढायांचा उल्लेख होतो. अनेक राजवंशांच्या सत्ता, त्यात झालेला बदल वगैरे उल्लेख येतात.

अरब इतिहासाचा इतिहासाच्या ज्ञानकोषाप्रमाणे या ग्रंथाने प्राचीन, मध्ययुगीन अरब जीवनाची प्रतिमा उभी केलीय. इस्लामी इतिहासकार नेहमी हिजरी सनावळ्यांचा उल्लेख करुन पुढे जातात. पण मुबारकपुरी यांनी इसवी सनानुसार तारखा दिल्या आहेत. त्यामुळे मुस्लीमेत्तर वाचकांची गैरसोय होत नाही.

वाचा : वहीदुद्दीन खान – भूमिकांचे डोंगर माथ्यावर घेऊन फिरलेला म्हातारा

वाचा : अनिस चिश्ती : इस्लामी तत्त्वज्ञानाचे मराठी विचारवंत

इस्लामचा जन्म आणि विकास

इस्लाम, ज्ञानाच्या आग्रहासह अज्ञानाच्या विरोधात जन्माला आलेले तत्त्वज्ञान आहे. प्रेषितांच्या प्रथम बोधप्राप्तीचा प्रसंग शिक्षणाच्या आग्रहाला प्रतिपादित करतो. प्रेषितांची निरक्षरता, हिरा नावाची गुहा, सामाजिक अज्ञानाचा अंधकार, त्यावरील प्रेषितांचे चिंतन, त्यातून सामाजिक अज्ञानाची गुहा भेदणारी प्रेषितत्वाची बोधप्राप्ती. या सर्व घटना ज्ञानाच्या अभिजात तत्वाला अधोरेखित करत, अज्ञान संपवणाऱ्या नवक्रांतीच्या जन्माची साक्ष देतात.

या स्थित्यंतरात इस्लामी धर्मजागरणाच्या चळवळीचा उदय झाला. इस्लाम म्हणजे नवा धर्म तर मुळीच नव्हता. मानवकल्याणाची मूल्ये ही सामाजात खोलवर रुजलेली असतात. तीच मानवी समूहाला जोडून ठेवतात. पण कालांतराने या मुल्यांवर मळभ दाटतं. ती धुसर होत जातात. मग त्याच्या पुनर्जागरणाची गरज निर्माण होते. तेव्हा चिंतनशील समाजक्रांतीच्या माध्यमातून धर्ममुल्यांवरील कीड बाजूला सारून, त्याचे मूळ स्वरूप समोर आणण्याचे प्रयत्न सुरू होतात.

क्रांतीची पार्श्वभूमी तयार होते. क्रांती विचारांच्या सर्जनातून परिवर्तनाचं बी समाजमनात पेरते. इस्लामी समाजक्रांतीचा जन्मदेखील या नैसर्गिक प्रक्रियेतून झालाय. प्रेषितांना हिरा गुहेत झालेला पहिला साक्षात्कार ते त्यांच्या अखेरच्या हजयात्रेतील भाषणापर्यंत इस्लामच्या विकासाचा पहिला टप्पा आहे.

वाचा : ज्ञान साधनेची महती सांगणारा रमज़ान

वाचा : ‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञाता’चा शोध

पॉलिटिकल इस्लामची समाजक्रांती

प्रेषितप्रणित या समाजक्रांतिमध्ये अनेक स्थित्यंतरे आली. नित्याने उद्भवत चाललेल्या आव्हानांशी झालेल्या संघर्षातून ही समाजक्रांती पूर्णत्वापर्यंत आली. समाजातील शोषणाला भांडवलप्रणित अर्थव्यवस्थेची रचना कारणीभूत असते. त्याला आव्हान दिलं की, आव्हान देणाऱ्यांशी ही व्यवस्था विशिष्ट वर्गाचे हित साधणारी यंत्रणा अबाधित ठेवण्यासाठी प्राणपणाने लढते. हा संघर्ष समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात होतो.

धर्मस्थळांपासून बाजारापर्यंत, न्यायालयापासून रणांगणापर्यंत, कुटुंबापासून समाजापर्यंत जीवनाच्या सर्व विभागात रण पेटवला जातो. इस्लामी समाजक्रांती उद्दिष्टापर्यंत पोचली ती या प्रत्येक रणक्षेत्रातील संघर्ष पचवून. इस्लामचा इतिहास हा या संघर्षाची गाथा आहे. दुर्दैवाने जगात अनेक देशात पसरलेल्या मुस्लीम सत्तेची जागा इंग्रजी राजवटीने घेतल्यानंतर हा इतिहास वेगळ्या अर्थाने आकलनाला घेतला गेला.

राज्यव्यवस्था स्वतःच्या अधिष्ठानाला मजबूत करणाऱ्या आणि विरोधकांना उद्ध्वस्त करणाऱ्या चिंतनप्रवाहाला जन्मास घालते. इंग्रजी राजवटीच्या प्रेरणेतून इस्लामी समाजक्रांती आणि मुस्लीम राजवटीच्या इतिहासाला विकृत करण्यात आले. त्यामुळे इस्लाम आणि मुस्लीम समाजाच्या शत्रूभावी मीमांसेलाच समाजातील वेगवेगळ्या ज्ञानशाखा मानणाऱ्या बुद्धिवंतांनी मान्यता दिली.

गेल्या काही दशकात आता इस्लामच्या विवेकवादी आकलनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे युरोपप्रणित इस्लामच्या आकलनपरंपरेला यामुळे हादरे बसत आहेत. आणि युरोपप्रणित आकलन नाकारणाऱ्या याच परंपरेत मुबारकपुरी यांच्या ‘अर्ररहिकुल मक्तुम’चा उल्लेख करावा लागेल.

वर्तमान काळात इस्लामला समजून घेणं गरजेचं बनलंय. राजकीय संघर्षात इस्लाम हा महत्त्वाचा विषय म्हणून पुढं येतोय. भारतात अभुतपुर्व अशी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती निर्माण झालीय. अशा परिस्थितीत इस्लामचा अभ्यास करण्यासाठीचं मानसशास्त्र समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे.

पुस्तकाचे नाव- अर्ररहिकुल मक्तुम, कुपीबंद अमृत

लेखक – शेख सफिऊर रहमान मुबारकपुरी

मराठी अनुवाद प्रा. . मीर इसहाख शेख

प्रकाशक –अक्षरमानव, पुणे

जाता जाता :